{Essay} शेतकर्याचे मनोगत मराठी निबंध । Shetkaryache manogat marathi essay

शेतकर्याचे मनोगत मराठी निबंध – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने आम्ही नेहमी नवीन निबंध घेऊन येत असतो.

तर आज आपण एका शेतकर्याचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत.
 

शेतकर्याचे मनोगत मराठी निबंध

शेतकर्याचे मनोगत मराठी निबंध

‘कांदा, मूळा भाजी अवघी विठाई माझी लसूण, मिरची, कोथिंबीरी अवघा व्यापला माझा हरी

सावता माळ्याचा हा अभंग रेडिओतून प्रसारित केला जात होता. मला वाटते शेतकरी हा अभंग रोजच अनुभवत असतो. शेतकऱ्याला रात्रंदिवस उन्हातान्हात, शेतात, मळ्यात राबां लागतं. तेव्हाच निसर्गाचं हे धन त्याच्या शेतात धावतं. लोकांच्या पोटाला मिळतं. त्यातून शेतकऱ्याचं वर्षभर घर चालतं.

गावात जाणारी एस. टी. चुकली म्हणून शेताच्या वाटेनं गावचा रस्ता धरला होता. तेव्हा कानावर हाक आली, “अगं पोरी कुठे चाललीस? इकडे ये.” शेतात शेंगा भाजल्यात त्या खा अन मग जा ! वळून पाहिले तर आमच्या गावातील दामूकाका मला बोलवत होते. चला तेवढीच घरी जायला सोबत झाली म्हणून मी त्यांच्याजवळ गेले तर शेतात काका, त्यांची घरधनीण, त्यांचा मुलगा आणि सून सर्वजण भूईमुगाच्या शेंगा तोडून पाटीत टाकत होते. त्यांचे कष्ट पाहून मन उचंबळून आले. मी त्यांना विचारले, “तुमच्या घरातील सर्वजण वर्षभर शेतात राब राब राबतात, त्यातून मिळणारे उत्पन्न तुम्हाला वर्षभर पुरते का ?” तेव्हा त्यांनी हळूच आपले डोळे टिपले आणि सांगू लागले,

“काय सांगू पोरी, माझ्या संसाराची चित्तरकथा, राबतो झालं! पण काय आणि किती पिकवतो ते काही विचारु नको. सालभर राबलं तर कुठं हातातोंडाशी गाठ पडते. मागच्या सालाला पाऊसपाणी पुरेसा झाला नाही. बी-बियाणं, खतांसाठी कर्ज काढलं. उत्पन्नाच्या जोरावर कर्ज तर सोडाच पण व्याजही फिटलं नाही. राहतं घर गहाण टाकून दुसरं कर्ज काढलं अन् पहिल्या कर्जाचा एक हप्ता फेडला. आता औंदाच्या सालाला पीकपाणी बरं झालं तर ठीक. नाहीतर राहत्या घरावरदेखील पाणी सोडावं लागणार.

सरकार सगळे कर्ज माफ करते, सबसिडी देतं म्हणून ऐकतोय पण ते सगळं काही अजून आमच्यापर्यंत आलं नाही. मधल्याच कावळ्यांनी ते लाटलं. आम्ही अडाणी माणसं. सरकारी अर्ज काही भरु शकत नाही. म्हणून गावातल्या तलाठ्यानं सगळ्या शेतकऱ्यांचे अर्ज भरले. रोज पंचायतीत चकरा मारतोय. पण तलाठी हात वर करतोय, कुणाला विचारायचं? कुंपणानच शेत खाल्लं तर कुठं तक्रार करायची. निमूटपणं कष्ट करुन घाम गाळायचा अन हाताला लागल ते खायचं.”

“पोरी तुम्ही नोकरदार माणसं महिन्याच्या महिन्याला पगार मोजता. आम्हा शेतकऱ्यांचं तसं नाही. आधी खतासाठी, बी-बियाणांसाठी कर्ज काढायचं अन् आलेलं पीक तयार झाले की धान्य विकून पैसे आधी सावकाराच्या घशात घालायचे. उरलेले घरासाठी वापरायचे. शेतात राबून देखील हातात काहीच नाही. म्हणून माझे सांगणे आहे की तुम्ही पुढे पुढे शिकत रहा. शिक्षण लई कामाचं आहे. मोठमोठ्या नोकऱ्या मिळवा अन् आमच्यासारख्या शेतकऱ्याला, सुखाचा घास मिळवून द्या. नाहीतरी आमचे सर्व जिणे काबाडकष्टातच गेले पण तुम्हीतरी सुखाने जगा. नाहीतर ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती होईल.

सुंदर ते ध्यान जाई शेतावरी घेवूनिया औत खांद्यावरी । सदा कासे खादीची लंगोटी नित्य निघतसे करण्या नांगरटी ।।

तुम्हाला हा शेतकर्याचे मनोगत मराठी निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

हे पण वाचा  :

५८+ Easy Marathi Nibandh | सोपे मराठी निबंध

पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध

मी वाट बोलतेय मराठी निबंध

 

1 thought on “{Essay} शेतकर्याचे मनोगत मराठी निबंध । Shetkaryache manogat marathi essay”

Leave a Comment